🚨उमरखेड पोलीस प्रशासनाचे अर्थपूर्वक दुर्लक्ष
✴️ शाळेच्या गणवेशातील मुले खेळतात मटका.

✴️ बसस्टँडवर महिला तसेच शाळेय मुली देखील जायला घाबरतात.
✴️ शेतात ये जा करण्यासाठी महिलांना काढावा लागतो मार्ग
✴️ अवैध धंद्याच्या भोवताली असणाऱ्या घरातील लहान मुलांवर वाईट परिणाम
✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक)
उमरखेड :- (दिनांक 19 जून) तालुक्यातील आशावादी उद्योग म्हणजे दारू, जुगार आणि मटका…!काहींच्या उत्पन्नाचा स्त्रोत तर काहींच्या बराबादीचा मार्ग सुद्धा हीच त्रिसूत्री…! त्यातलाच युवा पिढीला बरबाद करणारा हैवान म्हणजे मटका…! चातारीच्या मुख्य बसस्टँडवर खुलेआम मटका सुरू असतो, ना गाजावाजा ना कुठली कारवाई, सर्वकाही आलबेल… जसं काय मटका म्हणजे वैध व्यवसाय.

सर्व सर्वात काळजीचे कारण म्हणजे मुख्य ऑटो पॉईंटवर हे तिन्ही व्यवसाय बिनधास्तपणे सुरू आहेत. गावातील नवतरुणांबरोबरच जवळच्या शाळेतील विद्यार्थी देखील जवळच असलेल्या अड्ड्यावर जाऊन मटका लावतात आणि सिंधी देखील पितात.शालेय परिसराच्या जवळपास अवैध व्यवसाय किंवा शासनाने बंदी घातलेला व्यवसाय असून हा नियम असताना देखील हे उघडपणे सुरू आहे.

याविषयी निर्बंध घालण्यासाठी बीट जमादार तसेच संबंधित पीएसआय यांना गावातील लोकांनी सांगितले असता “बघतो” ” पाहतो” एवढेच म्हणतात परंतु प्रत्यक्षात काहीही कारवाई करण्यात येत नाही. त्यामुळे उद्याचे भविष्य असलेल्या नव्या पिढीचा पायाच मटक्याच्या अवैध व्यवसायावर उभा राहणार की काय…? असा प्रश्न उपस्थित होत आहे. मुख्य बस स्टैंड वर आणि शाळेच्या जवळ हा व्यवसाय असून शाळेच्या आवारापासून निर्धारित अंतरापर्यंत तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी आहे.
परंतु अवैध व्यवसाय करण्यास मुभा आहे का ? असा प्रश्न आता सर्वसाधारण नागरिकांना पडायला लागला आहे. मुख्य बस स्टँडवर आणि शाळेच्या जवळपास सुरू असणाऱ्या अशाप्रकारच्या अवैध व्यवसायामुळे महिलांना शेतात ये जा करण्यासाठी गावाला ऑटोमध्ये बसण्यासाठी बस स्टँडवर थांबण्यासाठी त्रास होत आहे तसेच जवळपासच्या लोकांना देखील या गोष्टीचा भयंकर त्रास होत आहे.

यावर कोणीतरी आवर घालणार की नाही हा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे 4 वर्षापूर्वी तत्कालीन ठाणेदारांना चातारी येथील नागरिक शिवाजीराव माने,भगवान माने (माजी सरपंच), शिवाजी नरवाडे इत्यादी नागरिकांनी विनंती केल्यावरून एक सभा घेऊन दारू मटका बंदीबाबत चर्चा केल्याने पोलिस प्रशासनाकडून 8 ते 10 महिने अवैध धंद्यावर आळा घालण्यात आला होता.